डॉ. गंगाराम उबाळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा : नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव या युवकाचे हत्याकांड घडविणाऱ्या आरोपींना जगजाहीर फाशी देऊन त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्या... ही मागणी धरत वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे दिली.
प्रचंड घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय आवार दणाणून सोडण्यात आले. सोबतच सर्वसामान्यांच्या हिताच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभागी होत एकजूट दाखवली. अक्षय भालेरावची जातीय द्वेषभावनेतून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने समाजबांधवांत संताप उसळला आहे. ही घटना महाराष्ट्रातील पुरोगामी संस्कृतीला काळीमा फासणारी असून संपूर्ण मानवतेला कलंकित करणारी आहे. घटनेचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी उजव्या हाताच्या दंडावर काळ्या फिती बांधल्या होत्या. शेलगाव देशमुख (ता. मेहकर) येथील मागासवर्गीय वस्तीजवळ पूर संरक्षण भिंत उभारावी, भिंत नसल्यास भविष्यात जीवितहानी घडल्यास संबंधित यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ग्रामीण अथवा शहरी भागातील निवासी प्रयोजनासाठी वापरात असलेल्या शासकीय जागा भोगवटदारांच्या नावे कायमस्वरुपी द्याव्या, मागासवर्गीय लोकांच्या ताब्यातील गायरान जमिनीचे कायम पट्टे करून द्यावे, सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी कर्ज द्यावे, राष्ट्रीयीकृत बँकांना तसे आदेश देऊन सिबिलची अट रद्द करावी, मोताळा तालुक्यात आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जाती समूहातील मुलांसाठी मोताळा तालुक्यात शासकीय व्यावसायिक समूहाची स्थापना करावी
पान्हेरा येथील बुद्धविहाराची जागा समाजबांधवांच्या ताब्यात कायम ठेवावी, खासगी हॉस्पिटल, खासगी शाळा, तसेच अन्य खासगी आस्थापना या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून सेवेत कायम करावे, 'शासन आपल्या दारी' या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, पत्रकार, वकील व कंत्राटी कर्मचाऱ्यांना गृह कर्ज उपलब्ध करून द्यावे, सैन्यात कर्तव्य बजावताना मृत्यू आल्यास जवानाच्या कुटुंबीयांना दोन कोटींची मदत करावी, सैनिकांसाठी राजकीय आरक्षण ठेवावे, या मागण्यांकडेही शासनाचे आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले.
या आंदोलनात अर्जुन खरात, बाला राऊत, नानासाहेब जाधव, अनिल पारवे, विजय पवार, किरण पवार, राहुल वानखेडे, समाधान डोंगरे, डॉ. राहूल दाभाडे, संतोष कदम, नीलेश जाधव, सतीश गुरचवळे, संदीप गवई, वसंता वानखेडे, समाधान पवार, अनिल पवार, गौतम गवई, अमर गवई, ॲड. सुरडकर, ॲड. अमर इंगळे, ॲड. वानखेडे, मेजर खिल्लारे, मेजर रमेश जाधव, गजानन गवई, सुरेश जाधव, शेख यासिन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते. तर महाराष्ट्रात अराजकता माजेल.
अक्षयच्या मारेकऱ्यांना फाशी देऊन त्याला न्याय द्यावा, ॲट्रॉसिटी किंवा त्याच्या समकक्ष कायदे अधिक कठोर करावेत, त्याच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे अर्थसाह्य द्यावे, भविष्यात त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले होणार नाहीत, ही खबरदारी म्हणून कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे, असे सतीश पवार यावेळी म्हणाले. गांभीर्याने दखल न घेतल्यास पुरोगामी महाराष्ट्रात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


إرسال تعليق