धनंजय काळे
प्रतिनिधी
सोलापूर :- पंढरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भीमा नदीकाठच्या शेतजमिनींमध्ये पाणी शिरल्याने उभे पिकं पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड झाले असून, या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) पंढरपूर तालुका उपाध्यक्ष भैय्या फडतरे यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.
याच अनुषंगाने भैय्या फडतरे यांनी सोमवारी सोलापूर गेस्ट हाऊस येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गोरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याचे निवेदन पालकमंत्र्यांना सादर केले. तसेच, शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.
भेटीदरम्यान रोपळे जिल्हा परिषद गटातील विविध स्थानिक विषयांवरही फडतरे यांनी पालकमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. यात रस्ते, पाणीपुरवठा व शैक्षणिक सुविधांसह शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा समावेश होता.
या प्रसंगी बोलताना भैय्या फडतरे म्हणाले की, “शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड फटका बसला आहे. शासनाने सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांचे संसार उभे राहणार नाहीत.”
यावेळी पालकमंत्री विजयकुमार गोरे यांनी निवेदनाची दखल घेत तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले.
Post a Comment