शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरू


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


👉🏻विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली


👉🏻बलिदान स्थळ व समाधी स्थळ स्मारक वढू, श्री क्षेत्र जेजुरी, अष्टविनायक व ऐतिहासिक


पुणे : पुणे जिल्ह्यातील प्राचीन वास्तू व गड किल्ला संवर्धनास, ऐतिहासिक तसेच धार्मिक स्थळांच्या विकासास २०२३-२४ मध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यादृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून नियोजनही करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्वत: या कामांकडे लक्ष दिले असून त्याचा आढावादेखील सातत्याने घेण्यात येत आहे.



             स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापुर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) ता. शिरूर येथील २६९ कोटी २४ लाख रुपयांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीच्या दिवशी विकास आराखड्याची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली. दोन्ही कामे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी  सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.



            श्री क्षेत्र जेजुरी विकास आराखड्यांतर्गत १०९ कोटी ५७ लाखांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुख्य मंदीराचे जतन संवर्धनाच्या कामाच्या निविदेने विकास आराखड्यास सुरुवात  करण्यात येत आहे. मौजे सदुंबरे ता. मावळ येथील श्री संत जगनाडे महाराज विकास आराखड्यासही मंजुरी देवून शासन मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयास ६२ कोटी ९३  लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे.

             अष्टविनायक विकासाचा ४३ कोटी २३ लाख रुपयांचा आराखडा  मुख्य सचिवांच्या मंजुरीने  मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारक विकास आराखडा सुधारीत करुन शासनास सादर करण्याचे काम करण्यात येत आहे. देशातील क्रांतिकारकांचे असिम त्यागाचे स्थान सर्वांना प्रेरणा व स्फुर्ती देणारे असावे आणि ते  राष्ट्रीय स्तरावरील  प्रेरणा केंद्र व्हावे यासाठी किमान २०० कोटींचा  आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी दिली आहे.

        डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी- ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची कामे पुरातत्व विभागामार्फत करताना मूळ वास्तु व प्राचीन शैली यांच्याशी साधर्म्य असणारी कामे दिसतील याकडे लक्ष दिले जाईल. गड व किल्ले ही राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिके असल्याने हा इतिहास जतन करुन ठेवण्यास प्राधान्य  देण्यात येत आहे. तसेच या कामांमुळे जिल्ह्यातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post